औरंगाबाद: एका ३०वर्षीय विवाहितेला तिच्याच माहेरच्या मंडळींनी १० लाख रुपयात विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर विवाहितेच्या पतीने पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे या प्रकरणी लेखी तक्रार केली आहे. सय्यद शकील सय्यद चांद अत्तार (वय ४० वर्षे, रा.चिकलठाणा) असे तक्रार करणार्या पतीचे नाव असून, रिझवाना सय्यद (वय ३२ वर्षे) असे विवाहितेचे नाव आहे.
सय्यद दाम्पत्याला चार अपत्ये आहेत. सय्यद शकील आणि त्यांची पत्नी रिझवाना यांच्यामध्ये काही महिन्यांपासून घरगुती वाद सुरू होता. त्यामुळे पत्नी माहेरी गेली होती. दोघांतील वाद शमत नव्हता. त्यामुळे दोघेही मागील अनेक महिन्यांपासून विभक्त राहत होते. दरम्यानच्या काळात सासरच्या मंडळींनी विवाहितेस भूलथापा देत दहा लाख रुपयात विकले आहे, अशी तक्रार पोलिस आयुक्तांकडे सय्यद यांनी केली आहे. सासरच्या मंडळींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व माझी पत्नी मला सुखरूप ताब्यात द्यावी, अशी विनंती सय्यद यांनी केली आहे.